"इतिहासातील काही सत्य घटनांचा इथे प्रसंगानुरूप उल्लेख केलेला असून या कथेतील बहुतेक प्रसंग काल्पनिक आहेत. काही चुका किंवा काही आक्षेपार्ह आढळल्यास कमेंट मध्ये सांगावे व मोठ्या मनाने माफ करावे हि विनंती."
लाल महालाच्या वाड्यात येऊन नुकतेच पाच सहा महिने झाले होते. शिवबा अन त्याचे सवंगडी नेहमीच काहीना काही उद्योग करण्यात मश्गुल असायचे. जिजाऊ तर त्यांच्या ना ना तऱ्हेच्या उद्योगांना अन कारस्थानांना कंटाळून गेल्या होत्या. तानाजी, येसाजी, कोंडाजी, बहिर्जी, बाळाजी अन अजून चार पाच जण अशी त्यांची पंधरा सोळा वर्षे वयोगटाची टोळी असायची. काही शिवबा पेक्षा वयाने मोठे, काही लहान तर काही जण त्याच्या वयाचे होते. शिवबाने आज रायरेश्वराच्या दर्शनाला जायचा बेत ठरवला होता. आजकाल शिवबा अन त्याच्या सवंगड्यांचे रायरीच्या डोंगर माथ्यावर अन रोहिडेश्वराच्या परिसरामध्ये फिरण्याचे प्रमाण वाढले होते. जाता जाता रोहिडेश्वराचे दर्शन अन ओळखीच्या गडकऱ्यांचीही भेट होणार होती. त्यामुळे सोबत शंभर दीडशे मावळ्यांची फौज दिमतीला होती. जवळच येसाजीचा गाव होता. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आजचा मुक्काम तिकडेच करणार होते. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून अगोदरच मावळ्यांचा दानागोटा येसाजीच्या गावी जाऊन पोहोचला होता. येसाजीही पुढे जाऊन सगळा बंदोबस्त करण्यात गुंतून गेला होता. बहिर्जी अन त्याचे साथीदार आजूबाजूच्या परिसरावर चाणाक्ष नजर ठेऊन होते.
दिवसाचा तिसरा प्रहार सुरु झाला होता. संध्यासमयी सूर्याच्या तांबूस सोनेरी प्रकाशाने आकाश उजळून निघाले होते. थंडगार वाऱ्याची झुळूक अचानक अंगाशी लगड करायची, तसं सरसरून अंगावर काटा यायचा. रायरेश्वराच्या मंदिराजवळचा परिसर हा तसा तीन एक कोसाच्या घेराचा, त्यामुळे फेरफटका मारायला चांगला वाव मिळायचा. जवळच असलेल्या उंच टेकडीवरून आजूबाजूचा नयनरम्य परिसर डोळ्यांचं पारणं फेडत असे. टेकडीच्या उत्तर बाजूला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर हे किल्ले दिसायचे अन नजर थोडी डावीकडे वळवली कि समोरचा केंजळगड नजरेत भरायचा. अन त्याच्या पलीकडे आदिलशाही अधिपत्त्या खाली असणारा जावळीचा प्रदेश टप्प्यात यायचा. जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर अन रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या पहारेकऱ्यासारखा भासायला. शिवबाला या डोंगराचे खास आकर्षण होते. डोंगराकडे बघत बराच वेळ विचार करत बसायचा.
शिवबा अन त्याचे सात आठ सवंगडी रायरेश्वराच्या मंदिराकडे चालू लागले होते. डोक्यावर निळ्या रंगाचा अन चंदेरी किनार असलेला जिरेटोप उठून दिसत होता. गुलाबी ओठांवर तांबूस काळ्या रंगाचं मिसरूड डोकावू पाहत होतं. कमळाच्या पाकळ्या प्रमाणे असलेले डोळे व त्यावरील रुंद कपाळावरचे रेखीव शिवगंध अन मधोमध असलेला केसरी टिळा, त्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या चेहऱ्यावर अजूनच आकर्षक दिसत होते. शिवबा अन त्याच्या मित्रांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले अन मंदिराबाहेर असलेल्या दगडी चौथऱ्यावर जरा निवांत हवेला बसले. बराच वेळ शिवबा शांत बसला होता, काहीच बोलत नव्हता.
तेवढ्यात कोंडाजी म्हणाला, "राजं.... हिकडं आल्यापासनं आज जरा लईच गप झालाईसा."
शिवबा, "कोंडाजी, असं किती दिवस फक्त हे नावापुरतं राजेपण मिरवायचं."
बाळाजी, "का...? काय झालं राजं....?"
शिवबाने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, "अजून कुठवर आपण आपल्याच मुलखात परक्यासारखं राहायचं. कुठे गडावर जावं म्हटलं, निसर्गरम्य ठिकाणी जायचं म्हटलं तरी गडकऱ्याची वा ठाणेदाराची परवानगी मिळेपर्यंत वाट बघत बसायची. आपलाच मुलुख, आपली माणसं अन हे परकीय लोक येऊन आपल्यावर राज्य करणार, यांचं लष्कर आपल्या रयतेचं पीकपाणी हिसकावून घेणार, मनमानी सारा वसूल करणार, दिवसाढवळ्या आय बहिणी उचलून नेणार. आता सहन नाही होत हे मित्रांनो."
कोंडाजी लगेच हाताची मूठ त्वेषाने उंचावत म्हणाला, "राजं.... तुम्ही फक्त हाक दया. या बारा मावळ्यातल्या घराघरातला एकूण एक माणूस हातात हत्यार घेऊन तुमच्या संगट हुभा राहायला तयार हाय."
"तुमच्या एका इशाऱ्यावर जीव द्यायला अन घ्यायला बी फूड मागं बगनार न्हाय जी.", तानाजीही तावानच बोलला.
"एवढ्यानं हे नाही होणार मित्रांनो. फक्त तरुण मावळ्यांना घेऊन जर आपण या जुलमी सत्ते विरोधात लढलो तर ते फक्त एक बंड होईल अन असे बंड केव्हाही मोडू शकतं. महाराज साहेबांनी सुद्धा असाच प्रयत्न केला होता. पण जर आपल्या मुलखातील वतनदार, जमीनदार, देशमुख या लोकांनी आदिलशाही वा मुघलांची चाकरी करणं सोडून एकजूट झाले तरच आपल्याला आपला अंमल, आपलं राज्य, स्वराज्य निर्माण करता येईल, साकारता येईल. जनतेला त्यांचं पीक पाणी खाता येईल. सगळीकडे शांतता अन सुबत्तता नांदू लागेल."
शिवबाचं बोलणं चालू होतं. बसलेल्या एकाएकाच्या अंगात रक्त सळसळत होतं. हातांच्या मुठी आवळल्या जात होत्या. स्फुरण चढत होतं. पुन्हा एकदा शिवबा शांत झाला अन उठत म्हणाला,
"चला खूप वेळ झाला. येसाजी, बहिर्जी वाट बघत असतील."
शिवबा अन त्याचे शंभर दीडशे मावळ्यांचा पथक मुक्कामाच्या ठिकाणी चालू लागले.
भल्या पहाटे शिवबा अन त्याच्या मावळ्यांनी गावाला निरोप दिला अन पुण्याकडे परतीचा प्रवास चालू झाला. हवेतला गारवा अंगाला झोबत होता. शिवबाने अंगावर शाल घट्ट बांधून घेतली होती. घोड्यांच्या टापांचा आवाज अन त्यामुळे मागे उडणारी धूळ हवेत मिसळून जात होती. हळू हळू सूर्य नारायणाचे दर्शन होऊ लागले होते. अंगावर सूर्याची सोनेरी कोवळी किरणे पडू लागली होती. पक्षांचा किलबिलाट आता ऐकू यायला लागला होता. मधूनच एखादा हरणांचा कळप हुंदडताना दिसे. तर मधेच मोरांचा "म्याऊऊउ........ म्याऊऊऊउ ....." आवाज कानावर पडे. समोरच काही माणसं हातात काठ्या घेऊन धावत जाताना नजरेस पडत होती. मागून येणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून मागे बघताच ती चार पाच माणसं बाजूला झाली अन कमरेत वाकून अन मान लवून त्यांनी शिवबाच्या येणाऱ्या मावळ्यांना वंदन केले. शिवबाने घोडा थांबवत तानाजीला पुढे पाठवून विचारपूस करायला सांगितली. तानाजीने शिवबाला येऊन सांगितले कि, समोरच्या गावात एका नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. दहा बारा शेळ्या मेंढ्यांचा अन दोन तीन गाया बैलांचा फडशा पडला होता. शिवाय दोन तीन माणसांना पण जखमी केलं होतं. आत्ताच एका लहान पोरावर झडप घालून त्येला जंगलात ओढत नेताना लोकांनी पाहिलं. जास्त लोक येताना पाहून त्याने त्या लहान पोराला तिथेच टाकून पळ काढला. त्यालाच बघायला हे लोक पळत निघाले होते.
त्यांना घेऊन शिवबाचं अश्वदल गावात दाखल झालं. एका झोपडी समोर बायांचा रडण्याचा अन ओरडण्याचा आवाज येत होता. माणसं कोंडाळं करून तिथं उभी होती. शिवबाचं पथक तिथे येताच लोकांनी वंदन करायला सुरुवात केली. शिवबाराजे घोड्यावरून उतार झाले अन चालत जाऊन त्या जखमी झालेल्या मुलाची अवस्था अन त्या बाईचा आक्रोश पाहून गहिवरून आले. शिवबाचं पथक गावातल्या शंभू महादेवाच्या मंदिरापाशी थांबले.
"तान्या, येश्या"
दोघेही सर्र्र्रदिशी पुढे आले. "जी राजं.."
"बोला... काय विचार आहे?", शिवबा म्हणाला.
तानाजीने सपकन म्यानातून तलवार बाहेर काढली अन म्हणाला, "इचार कसला राजं आता. तुम्ही फकस्त सांगा, आत्ता त्या वाघाला जित्ता आणतो तुमच्या म्होरं.."
"आम्ही करणार त्या वाघाची शिकार..!", शिवबाराजे म्हणाले.
येसाजी, "आम्ही हाय कि राजं हितं. तुम्ही कशाला? तुम्ही फकस्त हुकूम सोडा."
"चला, आपण सगळेच जाऊया मग."
लगेच कोंडाजी म्हणाला, "चालतंय कि... चला. आज त्येचा मुडदाच पाडू."
वाघाची शिकार करायची योजना नक्की झाली. बहिर्जी अन त्याच्या दोन तीन चलाख साथीदारांनी गावातल्या माहितगार तरुणांना घेऊन वाघ कुठे आहे हे नेमकं शोधून काढलं होतं. अन लागलीच येऊन शिवबाच्या कानावर घातलं. शिवाय जंगलाची खडानखडा माहिती असणारे काही लोकही शिवबाने बरोबर घेतले होते. त्यांच्या माहितीनेच सगळी योजना आखून कोण कोण कुठे कुठे थांबेल अन वाघावर हल्ला कुठून करायचं नक्की झालं होतं.
एखाद्या मेंढराचा किंवा शेळीचा वाघासाठी सावज म्हणून वापर करावा लागणार होता. पण शिवबाला तेही जीवावर आलं होतं. कारण त्या मुक्या जीवाशी खेळून वाघाला मारणे त्याच्या बुद्धीला पटत नव्हते. शेवटी बहिर्जीने स्वतः शेळीचा आवाज काढून वाघाला फसवायचा धोका पत्करला.
वाघ ज्या वाटेने येणार होता त्या वाटेवरच एका झुडपामध्ये बहिर्जी लपून बसला होता. त्याच्या कमरेला एक दोर बांधून त्याचं दुसरं टोक कोंडाजी अन बाळाजी शेजारच्या झाडावर धरून बसले होते. जर वाघाने बहिर्जीवर हल्ला केलाच तर कोंडाजी त्याला झाडावर ओढून घेणार होता. झुडपाच्या विरुद्ध बाजूला एका मोठ्या झाडाच्या खोडाच्या आडोशाला समोर झाडाच्या फांद्या अन पाने लावुन केलेल्या जाळीच्या पाठीमागे शिवबा हातात तिर कमान घेऊन उभा होता. कमरेला तलवार अन जवळच भालाही ठेवलेला होता. त्याच्या मागे तानाजी भाला घेऊन तर अजून चौघे जण हातात तिरकमान घेऊन सावध होते. शिवाय अजून दहा बारा मावळे हातात तलवारी भाले घेऊन उभे होते. वाघ येताच एकाच वेळी त्याच्यावर बाणांचा वर्षाव होणार होता.
येसाजी अन अजून दोघेजण झुडपापासून वाघ येण्याच्या वाटेवरच्या जवळच्या झाडावर दबा धरून बसले होते. हातात भाले घेऊन सगळे सज्ज होते. येसाजीच्या इशाऱ्यावर कोंडाजी दोरीला हिसका देणार होता अन बहिर्जीला हिसका लागताच तो जोरजोरात बकरीचा आवाज करणार होता. सगळे जण ठरल्या प्रमाणे आपापल्या जागेवर दबा धरून बसले होते.
जंगलात निस्तब्ध शांतता पसरली होती. फक्त पक्षांचा मधूनच आवाज होई. सूर्यही हळू हळू वर येऊ लागला होता. अचानक एकदम समोरच्या डोंगरवजा टेकडीवरून गावातील काही जिगरबाज तरुणांनी हातात भांडी अन ढोल घेऊन जोर जोरात बडवायला सुरुवात केली. वाघ ज्या ठिकाणी बसला होता तिथून काही अंतरावरून ते हळू हळू पुढे पुढे येऊ लागले. तसं वाघ त्यांच्या विरुद्ध दिशेने शिकारीच्या ठिकाणाकडे पळत येऊ लागला. येसाजीने ते धूड आपल्याच दिशेला येताना पाहून काही आवाज काढून ढोल अन भांड्यांचा आवाज बंद करण्याचा इशारा केला. समोरच्या गवतातून, झुडपांतून खसखस आवाज होऊ लागला. आता ढोलांचा अन भांड्यांचा आवाजही बंद झाला होता. अचानक ते धूड दुसऱ्या दिशेला वळताना पाहून झाडावर बसलेल्या येसाजी ने पटकन कोंडाजीला इशारा केला. दुसऱ्या क्षणी त्याने जोरात दोरीला हिसका दिला. त्या सरशी बहिर्जीने शेळीचा मोठमोठ्याने आवाज करायला सुरुवात केली. अचानक ते तांबडं पिवळं चट्टेरी अन काळ्या पट्ट्यांच धूड थांबलं अन बहिर्जी जिथे लपून बसला होता त्या झुडपाच्या दिशेने झेपावू लागलं. आता फक्त पंधरा वीस पावलांच अंतर शिल्लक होतं. वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात त्याची दमदार पावले टाकत अन गुरगुरत सावकाश शेळीचा आवाज येत असलेल्या झुडपाजवळ येऊ लागला होता. दोन चार माणसांना सहज लोळवेल एवढं मोठं ते धुडं होतं. चालीबरोबर त्याची सोनेरी कातडी उन्हात झळाळून निघत होती. ते अजस्त्र धूड आपल्याच दिशेने येताना पाहून बहिर्जीच्या छातीत धडधड वाढू लागली होती. शिवबाने फांद्यांपासून बनवलेल्या जाळीतून ते धूड निरखून घेतलं. अन बाणाचा अचूक नेम धरला. त्या पाठोपाठ सावध पवित्र घेऊन बाकिच्यांनीही आपापले बाण ताणले.
अचानक कोंडाजीला दोरीचा हिसका बसला. झुडपात खुसखुस वाढू लागली तशी कोंडाजीने दोरी वर ओढायला सुरुवात केली. बहिर्जी वर वर जाऊ लागला. वाघ आता त्या झुडपावर झडप घालण्याच्या पवित्र्यात असताना अचानक शिवबा अन त्यांच्या साथीदारांनी सप सप बाण वाघाच्या दिशेने सोडले. एका बाण वाघाच्या डोक्यावरून गेला. वाघ सावध झाला. तो मान वळवणार तोच दुसऱ्या क्षणी एक बाण त्याच्या डाव्या कानसुलात घुसला तर दुसरा पुढच्या पायाच्या वर तर बाकीचे हुकले. त्यासरशी त्याने मोठयाने एक डरकाळी फोडली. त्याच्या आवाजाने सारा आसमंत दुमदुमून गेला. त्याच्या कानातून रक्ताची धार लागली होती. मानेला झटके देत गुरगुरत तो बाण आलेल्या दिशेने झोकांड्या देत, तोल सावरत झेपावू लागला. पुन्हा एकदा सप सप बाण सुटले. यावेळीही दोन तीन बाण त्याच्या शरीरात घुसले. त्यासरशी ते अजस्त्र धूड जमिनीवर गुरगुरत धाडकन कोसळलं. कोंडाजी, येसाजी, बहिर्जी अन त्यांचे चार पाच साथीदार खाली आले. वाघाच्या मागच्या बाजूने हातात भाले घेऊन पुढे सरसावू लागले. शिवबा अन तानाजीही हातात भाले पेलत जाळीतून बाहेर आले. वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज अजूनही येत होता. शिवबा धीमी पावलं टाकत अन भाला पेलत समोर येत होता. अचानक ते धुड उठलं अन डोळ्यांचं पातं लवते न लवते तोच ते मोठ्याने गुरगुरत शिवबावर झेपावलं. एकदम अंगावर आलेलं ते एवढं मोठं धुड अन त्याचा तो आवेश पाहून शिवबा क्षणभरच गंगारला. पण दुसऱ्याक्षणी स्वतःला सावरत, होत्या नव्हत्या शक्तीनिशी भाल्याचा वार वाघाच्या छताडावर केला. रक्ताची चिळकांडी शिवबाच्या तोंडावर उडाली. शिवबा दोन तीन पावलं जाऊन मागे कोसळला.
कोंडाजी अन येसाजी एकदम ओरडले, "राजं ssssssss".
दोघेही एकदम शिवबाकडे धावले. वाघाच्या पंजाने निशाणा साधलेला होता. शिवबाचा अंगरखा डाव्या खांद्यापासून छातीच्या उजव्या भागापर्यंत फाटला होता. रक्ताच्या तीन लकेरी छातीवर स्पष्ट दिसू लागल्या अन त्यातून रक्त डोकावू लागलं. पण तोवर भाल्याचा फाळ वाघाच्या छताडात घुसून आरपार झाला होता. भळभळ रक्त वाहू लागलं होत अन ते अजस्त्र धुड जमिनीवर निपचित पडलं होतं. येसाजी अन कोंडाजीने धावत जाऊन शिवबाला उचलले. तानाजीने पुन्हा दोन तीन वेळा भाला वाघाच्या पोटात खुपसून खात्री केली. मावळ्यांनी शिवबाला उचलून गावात नेले. त्या वाघाला उचलण्यासाठी चार पाच माणसं लागली. जखम खूप खोल नव्हती. वैद्यांनी झाड पाल्याचा लेप लावुन जखम बांधुन घेतली. सगळीकडे शिवबा राजेंचा जयजयकार चालू होता. शिवबाराजेंनी वाघ मारला म्हणून सगळीकडे एकच बोभाटा झाला. जो तो मेलेल्या वाघाला बघायला गर्दी करू लागला होता.
वाघाचं धुड घोड्यावर लादून, थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा शिवबाचं अश्वद्ल पुण्याच्या दिशेने दौडू लागलं. सगळेच आनंदात होते, पण शिवबाच्या मनात फक्त एकच भितीयुक्त विचार घोळत होता,
"हे आऊसाहेबांना कळलं तर????"
"जय शिवराय"
****
No comments:
Post a Comment